श्रीरामपूर तालुक्यात विशेष करून एकलहरे,रांजणखोल, उक्कलगाव, बेलापूर परिसरात कांद्याची जोरदार लागवडीची लगबग सुरू असून,अवकाळी पावसाने कांदा रोपाचे नुकसान झाल्याने कांद्याच्या रोपांना अधिक भाव आला आहे.येथील शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात कांद्याचे बियाणे टाकले होते.

रोप चांगल्यापैकी उगवले होते.परंतु नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जी कांद्याचे बियाणे टाकली होती.ती या जोरदार पावसामुळे जागीच दबली गेली आणि जी काही उतरली होती ती कोवळी असल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ती सततच्या पावसामुळे नष्ट झाली.

तेव्हा शेतकऱ्याने पुन्हा नवीन जमीन तयार करून शिल्लक असलेले कांद्याचे बियाणे पुन्हा टाकली व कांद्याची रोपे शिल्लक राहिली नाही. ज्या शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार रुपये पायली कांदा बियाणे विकत घेऊन टाकली आहेत.

त्याच रोपांची किंमत एकरी तबल १५ ते २० हजार रुपयांवर गेली आहे परंतु तेही मिळत नाही.लागवड झाली तर पुढे निदान कांद्याला भाव मिळेल या आशेने रोप कोठे मिळते का ? म्हणून कांदा उत्पादक शेतकरी ग्रामीण भागात रोपे शोधताना दिसून येत आहे.

तर कांद्याच्या रोपांना अधिक भाव आला आहे लागवडीबरोबर उत्पादनाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर वाढला असून, चालू वर्षी कांदा लागवड करताना शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाचा खर्च देखील वाढणार आहे.

चालू वर्षी एक एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली.तर साधारणतः ५० ते ५५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.रोपे वाढीच्या अवस्थेतच पाऊस पडल्याने कांद्याची रोपे पूर्णतः सडून गेली.त्यामुळे शेतात कांदा लागवड करायची असेल तर कांद्याची रोपे विकत आणावी लागत आहेत आणि तेही भरमसाठ पैसे देऊन आणल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही.

तालुक्यातील एकलहरे, उक्कलगाव परिसरात कांद्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.यासाठी शेतकऱ्यांनी शेतात कांदा रोपांचे नियोजन केले होते.मात्र जोरदार पावसाने कांदा रोप वाया गेल्याने रोपांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होत आहे.

सध्याचे कांदा लागवडीचे चित्र पाहिले तर शेतकऱ्यांना भरमसाठ पैसे खर्च करुन कांद्याची रोपे कांदा लागवडीसाठी बाहेरून खरेदी करावी लागत आहेत. परंतु हा खर्च निश्चितच शेतकऱ्यांना परवडणारा नाही.