शेतीमाल उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना शेतकऱ्यांकडे माल आल्यावर मात्र भाव पाडले जातात म्हणून सरकारने शेतमालाचा हमीभाव कायदा करावा,अशी मागणी भाकपचे राज्य सेक्रेटरी अॅड. सुभाष लांडे यांनी केली.
कापूस व तुरीला १५ हजार रुपये तर उसाला ५ हजार व सोयाबीनला ११ हजार भाव मिळावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने येथील तहसील कार्यालय, मार्केट कमिटी या ठिकाणी गुरूवारी निदर्शने आंदोलन करण्यात आले.यावेळी तहसीलदार व बाजार समितीचे सचिवांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अॅड. लांडे बोलत होते.या आंदोलनात कॉ. संजय नांगरे, बापूराव राशिनकर, भगवानराव गायकवाड, बबनराव पवार, संदीप इथापे, राम लांडे, दत्ता आरे, आत्माराम देवढे, अशोक नजन, अॅड. भागचंद उकिरडे, गोरक्षनाथ काकडे, सय्यद बाबुलाल, विष्णू गोरे, भिवा घोरपडे, विष्णू चव्हाण, विनोद मगर, राजेंद्र आरेकर आदी सहभागी झाले होते.
अॅड. लांडे म्हणाले,सध्या शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, तूर विक्रीसाठी आलेले आहेत.या काळात खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली आहे.मागील वर्षी तूर ११ हजारांपर्यंत, दोन वर्षांपूर्वी कापूस ११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता.चालू वर्षी मात्र तूर, कापूस, सोयाबीन यांचे भाव खूपच पाडण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते याला वाचा फोडण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.जिल्ह्याबाहेर उसाला विनय कोरे यांच्या कारखान्याने पहिली उचल ४३०० रुपये जाहीर केली आहे.संगमनेर व काही कारखाने ३५०० रुपये पर्यंत भाव देतात.
परंतु आपल्या परिसरातील कारखाने तीन हजार रुपयाच्या आत भाव देत आहेत हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे.सर्व गोष्टींची भाववाढ होत असताना शेतकऱ्यांना मात्र हमी भाव मिळत नाही.तूर, कापूस १५ हजार रुपये तर सोयाबीनला ११ हजार रुपये भाव मिळावा,उसाला ५ हजार रुपये भाव मिळावा यासाठी खासगी व्यापाऱ्यांनी खरेदीची पक्की पावती द्यावी.
शेतकऱ्यांकडून कमी भावाने खरेदी केलेल्या मालाला वाढीव भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात यावी,शेतीमाल हमी भावाचा कायदा करावा व शेतकऱ्यांची फसवणूक करून हमी भावापेक्षा कमी भावाने शेतीमाल खरेदी केल्यास गुन्हा दाखल करण्यात यावा,कृषी उत्पन्न बाजार समितीने शेती मालाच्या खरेदी विक्री वेळी शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा म्हणून हस्तक्षेप करून शेतकरी हिताची भूमिका घ्यावी,अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.