अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतेक सर्व साखर कारखाने सुरू होऊन एक महिना होत आला आहे.तरीही शेवगाव मधील साखर कारखानदारांनी येत्या गळीत हंगामातील उसाचे दर जाहीर केले नाहीत.आचारसंहिता चालू होती त्यामुळे शेतकरी संघटनेने याबाबत साखर कारखानदारांना छेडले नाही,परंतु आता आचारसंहिता शिथील झाल्यानंतर ऊस दराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे यांना पाठवलेल्या निवेदानामध्ये याबाबत चालू वर्षी खताच्या वाढलेल्या किमती मजुरीचे दर अनियंत्रित हवामान महागाई या सर्व गोष्टीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.

या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून ऊस उत्पादनामध्ये घट झाली आहे.त्याचबरोबर ऊस तोडणी व ऊस वाहतूक यामध्ये सरकार वाढ करते परंतु एफ आर पी मधून वाहतूक तोडणी खर्च वजा केला जातो,त्यामुळे ऊस उत्पादकांना कमी मोबदला मिळतो असे वर्षानुवर्ष चालू असल्यामुळे ऊस उत्पादक अन्य पिकांकडे वळला आहे त्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे.

वरील सर्व घटकांचा विचार केला असता शेतकरी संघटनेने पुढील मागण्या केल्या आहेत.येत्या गळीत हंगामात विना कपात ३.१०० रुपये पहिली उचल मिळावी.तसेच हंगाम पूर्ण झाल्याच्या नंतर दुसरी उचल मिळावी.मागील हंगामामध्ये काही कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसाचे पैसे बाकी आहेत ते व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे.

ऊस जाळून केला जाणारा उसाचा पुरवठा तात्काळ बंद करावा.कारखान्यांच्या वजन काट्याचे शेतकरी संघटनाचे पदाधिकारी व कारखानदार यांच्या समक्ष वजन काटा निरीक्षकांकडून तपासणी करावी.

सरकारच्या केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे कारखाने व ऊसाच्या बिलातून कोणत्याही प्रकारची कपात करू नये.ऊस वाहतूक करणारे सर्व वाहतूक चालक हे परवाना धारक असावेत, तसेच त्यांचा विमा उतरलेला असावा.

अशा विविध मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवगावचे तहसीलदार तसेच पाथर्डीचे प्रांताधिकारी, प्रादेशिक सहसंचालक आहिल्यादेवी नगर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव, तसेच लोकनेते मारुतराव घुले पाटील साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, गंगामाई शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड हरी नगर, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांना मेलद्वारे पाठवले आहे.

शनिवार १४ डिसेंबर पर्यंत या संदर्भात निर्णय घेऊन शेतकरी संघटना व कारखानदारांचे प्रतिनिधी या संदर्भात बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा अन्यथा शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने सोमवार १६ डिसेंबर २४ रोजी ऊसतोड वाहतूक बंद करण्याचे आवाहन करण्याची आवाहनही शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी पत्राद्वारे दिले आहे.