Ahilyanagar News : सध्या विवाह जमविण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र पोलिसांना याप्रकरणी काहीच माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नोकरी नसने किंवा इतर कारणामुळे अनेक तरुणांचे विवाह रखडले आहेत. त्यामुळे लग्न होण्यासाठी हे तरुण काहीही करण्यास तयार असतात.

नेमका हाच धागा पकडून अशा तरुणांना गंडवणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. या टोळीतील एजेंट अशा लग्नाळू तरुणांच्या घरातील सदश्यांकडून मोठी रक्कम घेऊन बाहेरील जिल्ह्यातील मुलीशी विवाह लावून देतात परंतु त्यानंतर काही दिवसातच सदरची नववधू घरातील किमती साहित्य घेऊन पळून जाते. अशा घटना जिल्ह्यात अनेक घडल्या आहेत मात्र अशा घटनांत पोलीस देखील काहीच करू शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या लोकांचे धाडस वाढले आहे.

नुकतीच संगमनेर तालुक्यात असाच प्रकार घडला आहे, नातेवाईकांसह मध्यस्थीने दाखविलेल्या मुलीशी गावातच लग्न करण्यात आले, मात्र मुलीचे परत जाण्याच्या बहाण्याने पसार होणाऱ्या टोळीचा पाठलाग करुन, एका महिलेसह पुरुषाला नाशिक रोड येथून पुन्हा गावात पकडून आणण्यात आले. दरम्यान, नवरीसह तिची मैत्रिण मात्र पसार झाली आहे. याप्रकरणी हा सिनेस्टाईल प्रकार तालुक्यातील चिकणी गावात घडल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात एका कुटुंबातील मुलाचे लग्न करण्यासाठी मुली शोधण्याचा प्रयत्न आई- वडीलासह नातेवाईक करीत होते. गावातीलच विवाह जमविणाऱ्या काही मध्यस्थींनी जालना जिल्ह्यातील एक टोळीने मुलगी असल्याची माहिती दिली.

लातुरची एक महिला व जालन्यातील एका पुरुषाचा यात समावेश आहे. नातेवाईक व मध्यस्थींची जालन्यातील विवाह जमविणाऱ्या टोळीतील सदस्यांची बोलणी झाली. विवाह जमविण्याच्या बदल्यात मुलाकडून २.५० लाख रूपये देण्याचे ठरले. विवाह करण्यासाठी टोळीचे सदस्य मुलीला घेवून चिकणी येथे आले. मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलाचे आई- वडील व नातेवाईकांना मुलगी पसंद झाली.

यावेळी बोलणी होताच विवाह चिकणी येथे करण्याचे ठरले. तुळशी विवाहाच्या दिवशी गावातील मंदिरात विवाह पार पडला. तत्पूर्वी टोळीतील नातेवाईकांना २.५० लाख रुपये रोख देण्यात आले. नोटांची चटक लागताच टोळीतील सदस्यांनी आणखी एका मुलीला जालना येथून बोलाविले. याही मुलीसाठी मुलगा पाहण्याचा कार्यक्रम दोन-तीन दिवस चालला, मात्र अपेक्षित स्थळासह रकमेबाबत बोलणी फिस्कटली.

दरम्यान, टोळीतील सदस्यांनी मुलीला गावी सोडण्यासाठी जायचे आहे, असे सांगत, तिच्यासोबत नव्या नवरीचेही परत मुळ करायचे आहे, असा बहाणा केला. टोळीतील दोघांसह दोन्ही तरुणी असे चौघेजण जालन्याला जाण्यासाठी पाच दिवसांपूर्वी संगमनेरहून नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर गेले, मात्र मुलांच्या नातेवायिकांना संशय आल्याने त्यांनी गावातील एक वाहन घेऊन, टोळीचा पाठलाग केला.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर त्या सर्वांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दोघेजण हाती लागले, मात्र दोन्ही मुली पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. पकडलेल्या दोघांना परत चिकणी येथे आणण्यात आले. त्यांना मुलाच्या नातेवाईकांनी चांगलेच फैलावर घेतले. पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकी देताच, टोळीतील एका सदस्याने १.८० लाख रूपये परत केले.