Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात ५१ हजार ९५४ प्रकरणे निकाली निघाले आहेत. त्यामाध्यमातून ६३ कोटी ९३ लाख ८८ हजार रुपयांची वसुली झाली आहे. लोकन्यायालयात प्रकरणे निकाली काढण्यात अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सेंट्रल बार असोसिएशन अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राष्ट्रीय लोकन्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये ज्येष्ठ पक्षकाराच्या हस्ते रोपट्‌याला पाणी घालून लोकन्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, सी. एम. बगल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटिल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सेंट्रल बार असोसिएशनचे, कोठारी, उपाध्यक्ष अॅड. महेश शेडाळे, ऍड. संजय पाटील, श्रीमती ऍड. भक्ती शिरसाठ, श्रीमती ऍड. आशा गोंधळे, श्रीमती ऍड. अरुणा राशिनकर, ऍड. राजाभाउ शिर्के व न्यायीक अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय लोकन्यायालयात न्यायालयातील सर्व प्रलंबित दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये दिवाणी दावे, बँकांची कर्ज वसुली प्रकरणे, कौटुंबीक वादाची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, विद्युत महामंडळाची वसुली प्रकरणे, राज्य परिवहन महामंडळची प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, फौजदारी तडजोडयोग्य प्रकरणे, उपप्रादेशिक परिवहन विभागाची दंडाची प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे तसेच ग्रामपंचायत मालमत्ता कर आदींचा सामावेश होता.

या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दाखलपूर्व ४९ हजार ३७५ प्रकरणे, प्रलंबित २ हजार ५७९ व विशेष मोहिम अंतर्गत १ हजार २४० प्रकरणे निकाली निघालेली आहेत. लोकन्यायालयामध्ये ६३ कोटी ९३ लाख ८८ हजार ८९४ रुपयांची वसुली झाली आहे.