Ahilyanagar News : गाव खेड्यात अहोरात्र धावत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना नेहमीच सरकारकडून उपेक्षित ठेवले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दिवाळी भेट रक्कम मिळणार आहे.

मात्र, ही रक्कम वाटप करण्यासाठी सरकारचा नकार असून, एसटी महामंडळ स्वतःच्या उत्पन्नातून ही रक्कम देणार आहे. निधी उपलब्ध करून देण्यात सरकारने पुन्हा एकदा पलटी मारली असून, सरकारचा नन्नाचा पाढा सुरूच आहे, अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारी या वर्षीची दिवाळी भेट रक्कम आचारसंहितेचा अडथळा आल्याने रखडली होती. सर्व कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट ६००० रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी आचारसंहिता लागू होण्याअगोदर म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी एसटी प्रशासनाने ५२ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.

या प्रस्तावासंदर्भात महामंडळाने सरकारकडे वारंवार विचारणा करूनही सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्या वेळी सरकारी अधिकाऱ्यांकडून आचारसंहितेचे कारण सांगितले जात होते.

आता आचारसंहिता संपल्यानंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांना तातडीने वाटप करण्यात यावी, असे सरकारकडून एसटी प्रशासनाला कळवण्यात आले असून, सरकार ही रक्कम एसटीला देणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

यामुळे सरकारने निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात पुन्हा एकदा पलटी मारली असून, सरकारचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. सध्या एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असून, अजूनही कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही.

पीएफ, ग्रॅच्युईटीसारख्या रकमा वेतनातून कपात केल्या, असे दाखवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र सदरच्या रकमा ट्रस्टकडे भरल्या जात नाहीत.

विविध प्रकारची एकूण २९०० कोटी रुपयांची देणी एसटीकडून पुरवठादार व इतरांना देय राहिली असून थकीत आहेत. आता आचारसंहिता संपल्यावरसुद्धा सरकार दिवाळी भेट रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार नसेल तर हे दुर्दैवी आहे.

निवडणुकीत एवढे यश मिळाले असताना सरकार अजूनही एसटीला मदत करत नसून एसटी सक्षम करण्याच्या फक्त गप्पा मारल्या जात आहेत हे दुर्दैवी आहे.