Ahilyanagar News : कृषी विभागाने जिल्ह्यात कांदा पिकाचा बोगस विमा उतरविण्यात आला असल्याचा प्रकार उघड केला असतानाच आता परत फळबाग नसतानाही २ हजार ५५ ठिकाणी फळबागा क्षेत्रावर बोगस विमा उतरविण्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे मात्र कृषी विभागाचे अधिकारी पुरते चक्रावून गेले आहेत.

हवामानात होत असलेल्या विविध बदलांमुळे शेतीवर विपरीत परिणाम होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. परिणामी दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावत होती. हे टाळण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलत अवघ्या १ रुपयात विमा योजना राबवण्यात सुरुवात केली.

या योजनेत शेतकऱ्यांना अवघा १ रुपया भरावा लागत होता तर उर्वरित रक्कम सरकार जमा करत आहे. तसेच विमा उतरवण्यात आलेल्या पिकांची पाहणी केली जात नसल्याने अनेकजण याचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारीत फळ पिक विमा योजना शासन निर्णय दि. १२ जून २०२४ नुसार मृग व आंबिया बहार सन २०२४ – २५ व २०२५ – २६ या वर्षाकरिता राज्यात राबविण्यात येत आहे. मृग बहार २०२४ मध्ये राज्यात एकुण ७३,७७७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असुन ५०,४४३.८६ हे विमा क्षेत्र संरक्षित केलेले आहे.

यामध्ये अहिल्यानगर जिल्हयात १३०८५ अर्जदारांनी सहभाग नोंदविला असुन ७५१५.२४ क्षेत्र विमा संरक्षित केलेले आहे. मात्र कांद्याच्या बाबतीत आलेला अनुभव पाहता प्रधानसचिव (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत मागील ३ वर्षामध्ये आढळुन आलेल्या बोगस अर्जाची संख्या पहाता मृग बहार २०२४ मधील सर्ब सहभागी अर्जाची १०० टक्के क्षेत्रिय तपासणी करुन घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. कृषि आयुक्तालयाने सर्व जिल्हयांना मृग बहार २०२४ मधील क्षेत्रीय तपासणी करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.

त्याअनुषंगाने अहिल्यानगर जिल्हयात सवे १४ तालुक्‍यात जात मृग बहार सन २०२४ मधील सहभागी शेतकऱ्यांच्या फळबागांची तपासणी केली असता २०५५ ठिकाणी फळबागा नसताना देखील विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर फळबागाचे क्षेत्र १०६२.३ हे. इतके आहे. तसेच ६६९ ठिकाणी फळबाग लागवडी पेक्षा जास्त क्षेत्राचा विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर फळबागांचे क्षेत्र २९२.०७ हे. इतके आहे. सदर फळबागांच्या विम्या हप्त्यापोटी राज्य शासनाचे ४४ लाख ७२ हजार तसेच केंद्र शासनाचे ४४ लाख ७२ हजार असे एकुण ८९ लाख ४४ हजार एवढया रकमेची बचत होणार आहे. अशी माहिती अहिल्यानगरचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.