Ahilyanagar News : सध्या एसटीत एकीकडे बसेस भंगारात निघण्याचे प्रमाण वाढले असताना नवीन बसेस केव्हा येणार, याबाबत काहीच स्पष्ट नाही. एसटीने २ हजार ४७५ स्व मालकीच्या नवीन बसेस घेण्याची घोषणा दोन वर्षापूर्वी केली. परंतु एकही बस ताफ्यात आली नाही. आता पुन्हा घोषणा झाली आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील बसेस कमी झाल्याने त्याचा प्रवासी सेवेवरही परिणाम होत आहे. राज्यातील विविध भागात यात्रा वा इतर मोठे कार्यक्रमानिमित्त पूर्वी मोठ्या प्रमाणात एसटीच्या फेऱ्या वाढवल्या जात होत्या.

परंतु बसेसची संख्या कमी झाल्याने आता या फेऱ्या वाढवण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील अनेक गावात एसटी बस जात नसल्याचे वास्तव आहे. सध्या वापरात असलेल्या अनेक बसची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. त्यामुळे अनेकदा रस्त्यातच या बस बंद पड्लेल्या दिसतात.

केंद्र सरकारचा नवीन वाहन कायदा तसेच जास्त प्रमाणात वापर झाल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) मागील पाच वर्षांमध्ये पाच हजार बसेस भंगारात निघाल्या आहेत. भंगारात निघालेल्या बसेस तुलनेत नवीन बसेस उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) २०१८- १९ दरम्यान १६ हजार ४१४ बसेस प्रवासी सेवेत होत्या. ही संख्या २०२२- २३ मध्ये घसरून १३ हजार ३१६ बसेसपर्यंत खाली आली. त्यामुळे बसेसची संख्या कमी होतांना दिसत आहे. तर ३१ मार्च २०२० दरम्यान एसटीच्या १ हजार ५८६ बसेस भंगारात निघाल्या.

३१ मार्च २०२१ मध्ये ९२९ बसेस, ३१ मार्च २०२२ मध्ये ७५२ बसेस, ३१ मार्च २०२३ मध्ये ५७९ बसेस तर ३१ मार्च २०२४ दरम्यान तब्बल १ हजार १२९ बसेस भंगारात निघाल्याची माहिती अधिकार कायद्याव्दारे प्राप्त झाली आहे .

दरम्यान जुन्या बसेस भंगारात निघत असताना नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात फारशा न आल्याने महामंडळातील बसेसची संख्या घसरली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी संचालक मंडळाची नागपुरात बैठक घेतली.

यावेळी त्यांनी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षात ३ हजार ५०० बसेस दाखल होणार असल्याचा व ईव्ही बसेस व भाडेतत्वावरीलही अनेक बसेस मिळणार असल्याचा दावा केला होता.

यावर आता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. मागील दोन वर्षांत घोषित नवीन बसेस गेल्या कुठे, असा या संघटनेचा प्रश्न आहे. मात्र सध्या बसची संख्या कमी असल्याचा फटका नागरिक सहन करत आहेत.