Ahilyanagar News : द्राक्षबागेतून उत्पन्न घेण्यासाठी एक एकर क्षेत्रासाठी सरासरी चार लाख रुपये एवढा खर्च होतो. गेल्या चार वर्षांत हवामान बदल द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर आला आहे. उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळच बसत नसल्याने राज्यातील द्राक्ष बागायतदारांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.
चार लाखांच्या नुकसानीला शासनाकडून केवळ १४ हजारांची भरपाई दिली जाते, अशी माहिती द्राक्ष बागायतदारांनी दिली. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी द्राक्ष बाग असलेल्या शेतकऱ्यांनी आता द्राक्ष बागाच काढून टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात द्राक्ष आंबट झाल्यास नवल वाटू नये.
सध्या निसर्गाने चांगलेच डोळे वटारले असून त्याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर होत असल्याने शेतकरी पुरता संकटात सापडले आहे. त्यामुळे शेती करावी तर कशी करावी आणि न करावी तर दुसरे काय करणार अशी इकडे आड अन तिकडे विहीर अशी अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे.
त्यात शासनाची चुकीची धोरणे, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, नैसर्गिक संकट व दराच्या घसरणीचे ग्रहण, उत्पादन खर्चातील वाढ यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. होणारी वारंवार हानी तसेच वाढत कर्जाचा बोजा या सर्व बाबीला कंटाळून मागील वर्षभरात राज्यात ६० हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागाच शेतकऱ्यांनी काढून टाकल्याचे चित्र आहे.
निर्यात धोरण, जीएसटीसारख्या कराची आकारणी, मजुरांचा तुटवडा, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, हमीभाव नसणे, अवकाळी पाऊस, गारपीट, अशा संकटांच्या मालिकांमुळे नाशिकसह सांगली, सोलापूर, बारामती, इंदापूर व पुणे या भागांतील द्राक्षबागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.