Ahilyanagar News : मी ही हिंदू आहे. परंतु इतरांचा कधीही द्वेष केला नाही. मानवता हा धर्म पाळून काम करत आहोत. मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. अनेक तीर्थस्थळ उभे केली आहेत.

परंतु विरोधकांनी काही खोट्या एजन्सी तयार करून खोटे व्हिडिओ टाकून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले. असा आरोप टोला माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव घेता निशाणा साधला.

पुढे बोलताना मी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे. एकदा पराभव झाला म्हणून खचून जाणार नाही. ज्यांनी कोणी तालुक्यात येऊन विष पेरण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हा हल्ला आपण सर्वजण मिळून परतवून लावू.

मागील चाळीस वर्षांत संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी झोकून देऊन काम केले. कधी जाती-धर्मावरून भेदभाव केला नाही. संगमनेर तालुक्यात एक विकासात्मक राजकारणाची संस्कृती निर्माण केली. असे देखील थोरात म्हणाले.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील पराभावाच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी आज स्नेहसंवाद मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, हिरालाल पगडाल, डॉ जयश्री थोरात, वसीमभाई यावेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होणार आहे. हिंदू मुस्लिम द्वेष पसरून काहींनी राजकारण केले. मीही हिंदू आहे पण सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. मोठ्या कष्टातून तालुका उभा केला.

दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका असा लौकिक देशात पोहोचवला. सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श पॅटर्न निर्माण केला.तालुक्यातील गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राजकारण केले.

कधीही कोणाला त्रास दिला नाही. कधी चुकीचा शब्द बोललो नाही. कुणाचे मन दुखवले नाही. निवडणूक संपली की राजकारण संपले अशी आपली पद्धत आहे. हीच परंपरा आपल्याला जपायची आहे. आपला सहकार चांगला आहे.

बाजारपेठ चांगली आहे. शेती समृद्ध झाली आहे. बायपास, हॅपी हायवेसह बसस्थानक, शहरातील भव्यदिव्य इमारती आणि निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन असे अनेक मोठमोठे प्रकल्प आपण राबवले आहे.

काम केले त्याबद्दलची कृतज्ञता सर्वांनी ठेवली पाहिजे विरोधकांनी बदनामीचं षडयंत्र रचलं. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असल्याचे ते म्हणाले.