Ahilyanagar News : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच उत्तरेतील अनेक मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडत होत्या. काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे सुजय विखे यांच्या सभेत झालेला गोंधळ व त्यापाठोपाठ वाहनांची झालेली जाळपोळ या घटना ताज्या असतानाच आता तर थेट श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर मंगळवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे डॉ.संजय फरगडे, जनार्धन गालपगारे, असे मातापुर येथे संजय लबडे यांची बोलेरो गाडी ( एमएच १७ सीएम७१९१) मध्ये ड्रायव्हर चेतन तनपुरे यांचेसह मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेले होते.
तेथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन हे चौघे बोलेरो गाडीत बसुन रात्री १ वाजण्याच्या सुमारास श्रीरामपुरकडे निघाले. यावेळी कांबळे हे गाडीमध्ये चालकाच्या शेजारील सिटवर बसलेलो होते. प्रवास करत असतांना दोन मोटारसायकल त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत असल्याचे कांबळे यांच्या लक्ष्यात आल्याने त्यांनी त्याबाबत सोबतच्या लोकांना सांगितले.
काही अंतर गेल्यानंतर रस्त्यात अशोक सहकारी साखर कारखाना, अशोकनगरचे मुख्य गेट आले. त्यामुळे कांबळे यांनी चालकास संरक्षणासाठी कारखान्याच्या गेटमधुन गाडी आत घेण्यास सांगितले. चालकाने गाडी गेटकडे वळविली परंतु त्यावेळी कारखान्याचे गेट अर्धवट बंद होते. त्यामुळे गाडी आत जावु शकली नाही म्हणुन चालकाने गाडी उभी केली.
त्यादरम्यान पाठलाग करणाऱ्या दोन मोटारसायकलवरील व्यक्तिनी त्यांच्या मोटारसायकल रोडच्या बाजुला उभ्या करुन तीन व्यक्ति अंदाजे २० ते २५ वयोगटातल्या, त्यापैकी शरीराने सडपातळ असलेले दोघेजण या बोलेरो गाडीच्या समोर चालत आले.
त्यामुळे कांबळे यांनी चालकाला गाडी मागे घेवुन पुन्हा श्रीरामपुरच्या दिशेने घेण्यास सांगितली. चालक तनपुरे हा गाडी मागे घेत असतांना गाडीच्या समोरील तिघांपैकी सडपातळ बांध्याच्या एका व्यक्तिने त्याच्या कंमरेतुन एक पिस्टल काढुन कांबळे यांच्या गाडीच्या दिशेन एक गोळी फायर केली.
परंतु गाडी वेगात मागे घेतल्याने ती गोळी गाडीला न लागता हवेत गेली. त्यानंतर चालकाने गाडी वेगात चालवुन श्रीरामपुरच्या दिशेने जाऊन प्रकाश चित्ते यांच्या घरी गेलो. व त्यानंतर या प्रकाराबाबत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला येवुन भाऊसाहेब कांबळे यांनी तीन अज्ञात व्यक्तिविरुध्द फिर्याद दिली. दरम्यान या प्रकाराने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.