गेल्या काही दिवसांपासून आयुर्वेद औषधांच्या नावाखाली उपचार करणारे बोगस डॉक्टर ग्रामीण भागात वाढले आहेत.तर दुसरीकडे अनेक ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांकडे काही दिवस काम करणारे कम्पाउंडरच नंतर डॉक्टर म्हणून काम करताना दिसून येत आहेत.
ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचे क्लिनिक अनेक ठिकाणी सुरू आहेत; परंतु तक्रार आल्याशिवाय कोणीही त्यावर कारवाई करताना दिसत नाही.जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने साधी पडताळणीही होत नाही.
अनेक गावखेड्यात बोगस दवाखाने उघडून बिनदिक्कतपणे उपचार केल्याचे दिसून येते.गावातच दवाखाना उपलब्ध असल्यामुळे, तसेच ते कमी पैसे घेत असल्याने रुग्णही वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी त्यांनाच पहिली पसंती देतात.
मात्र, डॉक्टर बोगस आहे की नाही, याची मात्र कोणीही शहानिशा करत नाही.अनेक ठिकाणी चांदसी, बंगाली डॉक्टरांचे हे बोगस दवाखाने दिसतात.
बोगस डॉक्टर कोणत्याही आजाराच्या रुग्णांना परतवून लावत नाहीत, यांच्याकडे सर्वच आजारांवरील औषधोपचार असतात. तो औषधोपचार म्हणजे पेनकिलर गोळ्या.या गोळ्ळ्यांमुळे तात्पुरता आराम पडतो; पण आरोग्यासाठी मात्र अतिशय धोकादायक ठरू शकते.
शहराच्या बाहेरील रिकाम्या भूखंडावर तसेच गावखेड्यात परप्रांतीय बोगस डॉक्टर आपला तंबू ठोकून रुग्णांना आयुर्वेदिक सह इतरही औषधोपचार करतात, याची कुठलीही हमी नसते.अशात हजारो रुपये औषधांच्या नावावर उकळले जात आहेत.औषधांच्या एका ग्रॅमसाठी १० हजारांपर्यंत पैसे घेतले जात असल्याचे वास्तव आहे
गावखेड्यातील परप्रांतीय बोगस डॉक्टर काही दिवस एखाद्या खासगी डॉक्टरकडे कम्पाउंडर म्हणून राहतात.नंतर विनाडिग्रीने आपलाच दवाखाना उघडून डॉक्टर बनून रुग्णांवर औषधोपचार करतात,काम असे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
आपला व्यवसाय जोमाने चालावा व अधिकाधिक पैसे कमविण्यासाठी आजकाल रुग्णांच्या जीवाशी खेळ चालविला जात आहे.इतकेच नव्हे,तर बोगस डॉक्टर अनेक दुर्धर आजार बरे केल्याचाही दावा करतात.त्यात आजाराने ग्रस्त असलेले सुशिक्षितही बळी पडत असल्याचे चित्र आहे.
गावात उघडण्यात येणाऱ्या दवाखान्यांतील डॉक्टर विनाडिग्रीचे व कुठलेही रजिस्ट्रेशन न केलेले असल्याचे दिसून येते.यामुळे हे डॉक्टर रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात.
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम राबविण्यात येते.मात्र, कारवाई केवळ एक-दोघांवरच होते.यात काहींवर गुन्हे दाखल करण्यात येतात; परंतु पुढे त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय थाटल्याचे दिसून येते.