संगमनेरमध्ये सध्या चोरीचे प्रमाण वाढले असून दिवसेंदिवस होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रासले आहेत.तालुक्यातील आश्विमध्ये देखील चोरट्यांचा त्रास वाढला असून पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तीन दिवसात चक्क चार चोऱ्या झाल्या असून यात दुचाकीसह चारचाकी सुद्धा चोरीला गेलया आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या विविध गावामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.मागील तीन दिवसांत चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून यामध्ये पिंप्री फाट्यावरून एक बोलेरो, चणेगाव येथून एक मोटरसायकल तसेच उंबरी-बाळापूर आणि आश्वी बुद्रूक येथून शेळ्यांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चणेगाव (ता. संगमनेर) येथील प्रशांत बाळासाहेब लोहाळे यांच्या घरासमोर लावलेली १२ हजार पाचशे रुपये किंमतीची मोटरसायकल (एम.एच. सी.क्यु. ४१११) पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली.
यावेळी अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान केले.त्यामुळे लोहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच पिंप्री लौकी, अजमपूर शिवारातील पिंप्री फाटा येथील महेंद्र माधव गिते यांची घराशेजारी लावलेली २ लाख ८० हजार रुपये किंमतीची बोलेरो गाडी (एम.एच. १६ ए.टी. ०९९२) (दि.१९) नोव्हेंबर रोजी चोरी करुन रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास चोरटे घेऊन चालले होते.
मात्र भगवान बाबा कमानी जवळ गाडी उभी करुन चोरटे पळून गेले.त्यामुळे महेंद्र गिते यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, उंबरी-बाळापूर येथील मंदा आबासाहेब भुसाळ या महिलेच्या घरासमोरील गोठ्यातून (दि. २४) नोव्हेंबर रोजी रोजी मध्यरात्री २० हजार रुपये किंमतीच्या ५ भोर जातीच्या शेळ्या चोरीला गेल्या आहे.
आश्वी बुद्रुक येथील यादव माधव म्हसे यांच्या घराशेजारील गोठ्यातून (दि. २४) नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १५ हजार रुपये किंमतीच्या दोन काठेवाडी शेळ्या चोरुन नेल्या आहे.त्यामुळे म्हसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
त्यामुळे भुसाळ यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून आश्वी परिसरातील गावांमध्ये लहान मोठ्या चोऱ्या रोज होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
विशेष बाब म्हणजे ही गावे आश्वी पोलीस ठाण्याच्या एकदम जळव आहे. त्यामुळे आश्वी येथे पोलीस स्टेशन जवळ असूनही चोरट्यांना पोलिसाचा कोणताही धाक येथे नसल्याचे दिसत आहे.
रोज गावामध्ये आणि परिसरात होणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंगचे प्रमाण सुद्धा कमी झाल्यामुळे चोरीच्या घटना वाढल्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे.