शहरात महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या कचरा संकलन कामावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक घराला क्यूआर कोड बसविण्यात येत आहेत.कचरा उचलल्यानंतर कर्मचाऱ्यांना हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे.

या माध्यमातून कचरा संकलन व्यवस्था सुरळीत व पूर्ण क्षमतेने राबवली जाण्यास मदत होणार आहे.शहरात सुमारे ९० हजार घरांवर क्यूआर कोड लावण्यात आले असून काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

शहरात दररोज सुमारे दीडशे टन कचरा जमा होतो.कचरा उचलण्यासाठी खासगी संस्थेमार्फत घंटागाडीचे नियोजन करण्यात आले आहे.मात्र, शहरात अनेक भागात घंटागाडी पोहचत नसल्याच्या, नियमित आणि वेळेत घंटागाडी येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

त्यावर उपाय म्हणून आता नागरिकांच्या घराला क्यूआर कोड लावण्यात येणार आहे.कचरा उचलण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे.क्यूआर कोड स्कॅन न केल्यास संबंधित भागातील कचरा उचलल्याची नोंद होणार नाही.

शासनाने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेमार्फत क्यूआर कोड बसविण्याचे काम केले जात आहे.हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.शहर स्वच्छतेच्या कामाचे, कचरा संकलनाचे रिअल टाईम देखरेख व संनियंत्रण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित आयसीटी प्रणाली लावण्यात येत आहे.

घंटागाडी आली अथवा नाही,कचरा घेतला गेला किंवा नाही,शहरातील किती नागरिकांनी कचरा वर्गीकृत किंवा मिश्र दिला अथवा कचरा दिला नाही,याबाबत माहिती मिळणार आहे, कचरा संकलन व्यवस्थेत नियमितता येऊन नागरिकांना वेळेत सुविधा मिळेल,असा विश्वास आयुक्त डांगे यांनी व्यक्त केला.

या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कचऱ्याची उचल होण्याची त्या क्षणीची माहिती मिळू शकणार आहे.कचरा गाडी आली किंवा नाही, कचरा घेतला गेला कि नाही, नागरिकांव्दारे कशा प्रकारचा कचरा म्हणजे विलगीकरण केलेला अथवा मिश्र कचरा दिल्या गेला, घंटागाड्यांचे रूट इत्यादी सर्व माहिती रिअल टाईम स्वरूपामध्ये प्रशासनास उपलब्ध होणार आहे.

तसेच, घंटागाड्यांचे रूट मॉनिटरिंग, सफाई कर्मचारी तसेच घंटागाड्यांचे लाईव्ह लोकेशन, ड्युटीवर असताना कर्मचाऱ्यांव्दारे वाया घालवण्यात आलेल्या वेळेबाबत रिपोर्ट, संकलन कर्मचाऱ्यांचे कार्याबाबतचे रिपोर्ट याव्दारे उपलब्ध होणार आहेत.

कचरा संकलन करताना घर सुटल्यास प्रशासनास त्वरित माहिती मिळणार आहे.त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत.या प्रणालीच्या वापराव्दारे सर्व कर्मचाऱ्याची डिजिटल हजेरी शक्य आहे.तसेच कर्मचाऱ्यांचे लाईव्ह लोकेशन व कामाची वेळ याबाबतीचे मॉनिटरिंग शक्य आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढण्यास तसेच सेवांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.पण तरी सुद्धा कर्मचारी हे नियम पाळतीलच का ? खरोखर स्वच्छतेची सुविधा मिळणार का ? असा नागरिकांमधून सवाल उठत आहे.