अहिल्यानगर शहरात सध्या महापालिकेमार्फत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.शहरातील रस्ते मोकळे असावेत,वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये अशा अनेक कारणासाठी अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय योग्य व स्वागतार्हच आहे.नगरकर या कारवाईचे स्वागत करीत आहे.
परंतु महापालिकेने विधानसभा निवडणूक आटोपताच हा विषय हाताळण्याचे ठरवले यावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.कारवाई निपक्षपातीपणे हवी तसेच कोणत्याही राजकीय दबावातून अथवा हस्तक्षेपातून कारवाई होता कामा नये अशी सर्वसामान्यांची भावना आहे,असे माजी महापौर यांनी म्हटले आहे.
मनपाचे पथक गोरगरीब फेरीवाले, हातगाडी वाल्यांना लक्ष करून त्यांचा रोजगार हिरावून घेत आहे या कारवाईमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अनेकांनी कर्ज काढून रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावून व्यवसाय टाकले आहेत. वर्षानुवर्षे त्यांच्या कुटुंबियांचे गुजरान या व्यवसायावर चालू आहे.
मात्र आता अचानक महापालिकेने कारवाई सुरू केल्याने त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.या कारवाई निमित्त मनपा प्रशासनाने काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.मनपाकडून दररोज फेरीवाले, भाजी विक्रेते, हातगाडी वाल्यांकडून प्रत्येकी १० रुपये शुल्क पावती घेतली जाते.
हे शुल्क नेमके कशासाठी असते याचा खुलासा होणे आवश्यक आहे.अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करताना नेहमीच गोरगरीब, हातावर पोट असलेल्यांपासून सुरू होते.ही मोहीम कोणाच्यातरी इशाऱ्यावर चालते का असाही संशय निर्माण होत आहे.
मनपाने पथारी वाल्यांचे बायोमेट्रिक पूर्ण केले आहे.आता त्यांनाच अतिक्रमण धारक समजून कारवाई केली जाते.या पथारी वाल्यांना जागा निश्चित का करण्यात आली नाही याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण २०१४ ची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहे.
त्या दृष्टीने नगर महापालिकेने आतापर्यंत हॉकर झोन जाहीर का केला नाही.शहरात पार्किंग झोन कुठे आहे हे सुद्धा जाहीर होणे आवशयक आहे.अनेक प्रश्नांची सोडवणूक न करता केवळ सवंग प्रसिद्धीसाठी अतिक्रमण हटव मोहिमेची घोषणा करून गोरगरिबांना त्रास दिला जात आहे, हे अतिशय चुकीचे ठरणार आहे.
कारवाई करताना आधी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वांशी विचारविनिमय करून पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने महापालिका प्रशासनाला फेरीवाले धोरणाचा पूर्ण विसर पडला आहे.
शहरातील काही हॉस्पिटलने पार्किंग जागेत मेडिकल दुकानाचे अतिरिक्त बांधकाम केलेले आहे.मनपाच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली होती अशा हॉस्पिटल वर आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही त्यामुळे निर्माण होणारा पार्किंगचा वाहतूक कोंडीची समस्या प्रशासनाला दिसत नाही.
कोणाचातरी वरदहस्त असलेल्या काही ठराविक बिल्डर्सच्या मोठ्या संकुलामध्ये पार्किंगच्या जागेत बिनधास्त गाळे काढले जातात त्याकडे कानाडोळा केला जातो.मनपाचा नगर रचना व अतिक्रमण विरोधी विभाग भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे.
मोठ मोठ्या पक्क्या अतिक्रमणाच्या कितीतरी तक्रारी या विभागात पडून आहे त्याकडे अर्धपूर्ण दुर्लक्ष केले जाते. अतिक्रमणावर कारवाई करताना अनेक ठिकाणी पक्षपातीपणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.प्रशासनाने नगर शहर अतिक्रमण मुक्त करताना कोणाचाही रोजगार हिरावला जाणार नाही,याची काळजी घेतली पाहिजे.
शहरातील अतिक्रमणाची सुरुवात पक्क्या अतिक्रमणापासून करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी दिले.
यावेळी संजय झिंजे, निलेश मालपाणी, महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष नलिनी गायकवाड, माजी नगरसेवक आसाराम कावरे, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष अंबादास बाबर, रजनीताई ताठे, रोहन शेलार, श्रवण काळे, भीमराज कराळे, अभिषेक जगताप, राहुल घोरपडे, चैतन्य ससे, अवि ठोंबरे, प्रशांत दरेकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.